पुणे : ‘पुलं, गदिमा आणि बाबूजी यांनी महाराष्ट्राच्या मनांवर राज्य केले. आता स्वर्गात देवांच्या समोर त्यांची मैफल चालू असेल, असे युगनिर्माते पुन्हा पृथ्वीतलावर होणे नाही,’ असे गौरवोद्गार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त काढले.
पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, त्यांच्या गीत, संगीत आणि साहित्यावर आधारित ‘स्वरशब्दांचे युगनिर्माते’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुक्तछंद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीवनगाणी’ संस्थेने या कार्यक्रमाची निर्मिती केली होती. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सुमित्र माडगुळकर, श्रीधर फडके, डॉ. सुनील देवधर आदी मान्यवर उपस्थित होते.
बाबूजी आणि गदिमांची, गोमू माहेराला जाते, चंद्र आहे साक्षीला, दिस जातील, एक धागा सुखाचा, माझे जीवन गाणे, सखी मंद झाल्या, कानडा राजा, इंद्रायणी काठी, गा बाळांनो, अशी अनेक अनेक गाजलेली गीते या वेळी सादर करण्यात आली. तर पुलंच्या फुलराणीमधील नाट्यप्रवेश, लता मंगेशकर यांनी पु. ल. देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रांचे वाचन, तसेच पुलंनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर नृत्यरचना सादर करण्यात आल्या.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक पं. उपेंद्र भट, सुवर्णा माटेगावकर, मंदार आपटे, स्वराली गोखले, दत्तात्रय मेस्त्री, मधुरा वेलणकर, योगेश देशपांडे, अरुण नूलकर, हेमांगी कवी, राजन जोशी, पराग माटेगावकर यांनी पुलं, गदिमा आणि बाबूजी यांची गीते, संगीत याचे सुंदर सादरीकरण केले.
प्रेक्षकांनी प्रचंड संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.